आयुष्मान आरोग्य मंदिर पावस जिल्हा. रत्नागिरी
पावस, रत्नागिरी येथे आयुष्मान आरोग्य मंदिराच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
दोन वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्राचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडलं होतं आणि आज पुन्हा त्याच इमारतीचं उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला — हा एक विलक्षण आणि समाधानदायी योगायोग आहे.
ही इमारत केवळ आरोग्यसेवेचं प्रतीक नसून, ती शासनाच्या “वचनपूर्तीच्या संस्काराची” साक्ष देणारी आहे.
भूमिपूजनापासून उद्घाटनापर्यंत — सर्व सहकारी, अधिकारी, आरोग्य विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे केंद्र आज साकार झालं आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं की कार्यक्रमस्थळी आवश्यक असलेला निधी पालकमंत्री म्हणून मी स्वतः मंजूर करणार आहे.
पावस बाजारपेठेतील रस्त्याचं काँक्रिटीकरण, गावातील मुख्य पुलासाठी ₹8 कोटींची तरतूद, तसेच गणपती मंदिरापासून भक्तनिवासापर्यंतच्या पुलासाठी ₹1 कोटी निधी आणि जोडरस्त्यांसाठी ₹50 लाखांचा निधीला मंजुरी दिली असल्याचं सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्यसेवा अधिक सक्षम व सर्वसमावेशक व्हावी यासाठी शासन ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या संकल्पनेवर काम करत आहे. पावसचे हे केंद्र त्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्पष्ट सांगितलं की —
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली राज्यातील सर्वात यशस्वी योजना आहे आणि ती बंद होणार नाही, उलट अधिक सक्षम होईल.
महाराष्ट्रातील लाखो महिलांना या योजनेतून थेट आर्थिक बळ मिळत आहे, याचा मला अभिमान आहे.
यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विनंती केली की —“रुग्णांशी आदरपूर्वक, हसतमुखानं वागा. तुमचं बोलणंच रुग्णांना अर्धं बरे करतं.”
पावस आणि परिसरातील नागरिकांना आता अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, याचा आनंद व्यक्त करून मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रशासन, आरोग्य विभाग आणि सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले.
