देवरुख येथील मुस्लिम एकल महिलांची वाटचाल–.
👉रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख हे सजग विचारांचे गाव असुन नुकतीच येथे मुस्लिम एकल महिलांची विशेष बैठक संपन्न झाली. देवरुख आणि परिसर, कडवई आणि परिसरातील ३५ महिला आणि अनेक कार्यकर्ते जमले होते. पैकी १९ मुस्लिम एकल महिला उपस्थित होत्या.
या बैठकीत या महिलांनी आपले विविध प्रश्न मांडलेत. या महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती बैठकीत देण्यात आली. या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे कशी मिळवायचीत, हे देखील स्पष्ट करण्यात आले.
उपस्थित असलेल्या व उपस्थित राहू न शकलेल्या तालुक्यातील सर्व मुस्लिम एकल महिलांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
या एकल महिलांच्या शिकणाऱ्या मुलामुलींना विविध शिष्यवृत्त्या मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
कोकणात तलाक पिडीत महिलांची संख्या अतिशय कमी आहे. काही वाद झाल्यास मुस्लिम समाजातील धुरीण सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करतात, सामंजस्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. यामुळे तुटे पर्यंत ताणले जात नाही, असे चांगले वास्तव समजून आले.
मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरी, ही नोंदणीकृत संस्था या जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन दोन जेष्ठ कार्यकर्ते या समितीत असून १९ मुस्लिम कार्यकर्त्यांची ही संस्था मुस्लिम समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. या संस्थेचे उपाध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयुब कापडी बैठकीस पूर्ण वेळ उपस्थित होते. विविध शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आज सोमवारी १७ ऑगस्ट रोजी आयुब कापडी यांनी पाठपुरावा बैठक आयोजित केलेली आहे.
कडवई येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सादीक काझी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह उपस्थित होते. त्यांच्या प्रयत्नातून कडवई येथील सात मुस्लिम एकल महिला देखील उपस्थित होत्या. देवरुख येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.शेख देखील उपस्थित होते. ज्यांच्या सहभाग, सल्ला व मार्गदर्शनाने कोकणातील प्रत्येक महत्त्वाचे सामाजिक कार्य पुढे सरकत असते, ते युयुत्सु आर्ते यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व सुत्रसंचालन केली.
कापडी, काझी, डॉ शेख, हमीद दलवाई इस्लामिक इन्स्टिट्यूट च्या अध्यक्ष इला दलवाई -कांबळी, सेक्रेटरी राजेंद्र बहाळकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
आयुब कापडी, डॉ शेख, काझी, रुबिना चव्हाण, युयुत्सु आर्ते व प्रदिप गुरव यांची समिती स्थापन करण्यात आली असून तालुक्यातील प्रत्येक मुस्लिम एकल महिलेला हक्काची योजना मिळेपर्यंत ही समितीने पाठपुरावा करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असे कार्य उभे करण्याचे उद्दिष्ट देखील ठरविण्यात आले.
दलवाई इन्स्टिट्यूट च्या उब प्रकल्पाच्या प्रमुख रुबिना चव्हाण व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
