त्यांच्या टीकेने आपलीच मते वाढतील, ज्यांना मतदारांनी खड्ड्यात घातलेय त्यांना मोठे करू नका,” पालक मंत्री मंत्री उदय सामंत यांनी दिल्या पदाधिकाऱ्यांना सूचना
➡️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
रत्नागिरीत मागील दोन तीन दिवसांपासून उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने आणि पालक मंत्री उदय सामंत यांच्यात जोरदार राजकारण तापले आहे..’सिंघम’ विरुद्ध ‘चिंगम’ या राजकीय वादाला चांगलीच फोडणी मिळत आहे. शिवसेना (उबाठा) उपनेते बाळ माने यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लगेचच जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर आता खुद्द राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
“बाळ माने यांच्या टीकेला यापुढे कुणीही उत्तर देऊ नका. त्यांना उत्तरे देऊन मोठे करू नका, ते आपल्यासाठी अदखलपात्र आहेत,” अशा सक्त सूचना मंत्री उदय सामंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती आहे.
काल दिवसभर या दोन नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे रत्नागिरीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, आता सामंत यांनी माने यांच्या वक्तव्याची दखलच न घेण्याची भूमिका घेतली आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, “ज्यांना मतदारांनी आधीच खड्ड्यात घातले आहे (पराभूत केले आहे), त्यांच्यावर टीका करणे आता बंद करा.” इतकेच नव्हे, तर बाळ माने यांच्या टीकेचा आपल्याला राजकीय फायदाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “उलट बाळ माने यांनी आपल्यावर केलेल्या टीकेने आपलीच मते वाढतील,” असे सामंत यांनी म्हटल्याचे समजते.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी “रत्नागिरीला माझ्यासारख्या ‘सिंघम’ची गरज आहे,” असे वक्तव्य केले होते.
बाळ माने यांच्या या ‘सिंघम’ वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सायंकाळी शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बाळ माने यांचा ‘सिंघम’ नव्हे, तर ‘जनतेने चार वेळा थुंकलेले चिंगम’ असा उल्लेख करत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.
दिवसभर चाललेल्या या कलगीतुऱ्यानंतर आता खुद्द उदय सामंत यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना ‘मौन’ बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे बाळ माने यांनी टीका केली तरी शिवसेनेकडून त्यावर अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता कमी झाली आहे..अजुन निवडणुकीच्या तारखा पण जाहीर झाल्या नाहीत तर ऐवढा हंगामा मग नंतर तर बघायलाच नको.. दिवाळी मध्ये जेवढ फटाके वाजले नाहीत त्यापेक्षा जास्त फटाके आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच वाजणार असे बोलले जात आहे
