मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला
रत्नागिरी : खेड तालुक्यात मुंबई -गोवा महामार्गावर दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चालक गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणारी मारुती व्हेगनार ही कार अचानक बिघाडामुळे पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. इंजिनमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच वाहनाने भीषण आग पकडली. काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण कारला वेढा घातला आणि अवघ्या काही मिनिटांत वाहन जळून खाक झाले.
प्रसंगावधान राखत चालकाने तत्काळ जळत्या कारमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र या प्रयत्नात तो गंभीर भाजला. त्याला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच पोलीस व खेड नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती. आगीमुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
