रत्नागिरी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी

रत्नागिरी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी

रत्नागिरी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी
58,815 उद्दिष्टाच्या तुलनेत 58,793 बालकांना पोलिओचे दोन थेंब-; व्यापक जनजागृती व सर्व यंत्रणेच्या समन्वयातून यश
👉रत्नागिरी- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत दि. 28 जून 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली मोहीम अत्यंत यशस्वी ठरली. जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 58,815 लाभार्थ्यांसाठी 1,659 पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. या मोहिमेसाठी 3,477 आरोग्य कर्मचारी कार्यरत होते, तर 346 पर्यवेक्षकांनी व अधिकाऱ्यांनी प्रत्येक पोलिओ बूथला भेटी देऊन लसीकरण प्रक्रियेचे प्रभावी पर्यवेक्षण केले. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून 58,815 उद्दिष्टाच्या तुलनेत 58,793 बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले.उर्वरित बालकांना घरभेटीत डोस देण्यात येतील.
या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण मोहिमेला जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष श्री. विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर,सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, माध्यम अधिकारी ,पीएचएन ,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक(पुरुष व महिला)आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा स्वयंसेविका, शीतसाखळी व लस सनियंत्रण कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,स्वयंसेवक ,तसेच इतर सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
 तालुकानिहाय पोलिओ लसीकरण कामगिरी :
मंडणगड – 2,129
दापोली – 5,812
खेड – 5,844
गुहागर – 3,718
चिपळूण – 12,266
संगमेश्वर – 4,719
रत्नागिरी – 15,587
लांजा – 3,292
राजापूर – 3,829
जिल्ह्यातील एकूण 58,815 बालकांपैकी एकूण 58,793 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.

या मोहिमेच्या यशामागे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राबविलेला व्यापक जनजागृती कार्यक्रम, प्रत्यक्ष गावोगावी केलेला प्रचार,पथनाट्य,आरोग्य विभागाच्या समाजमाध्यमांद्वारे प्रभावी माहिती प्रसार, विविध वर्तमानपत्रे, डिजिटल माध्यमे, आकाशवाणी तसेच जनतेचा उत्स्फूर्त सहभाग हे महत्त्वाचे घटक ठरले. त्यामुळे जिल्हाभरात पोलिओ लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व विभागांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाच्या समन्वयामुळे रत्नागिरी जिल्ह्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखल्याचे त्यांनी नमूद केले.

  • (डॉ. अनिरुद्ध आठल्ये),
    जिल्हा आरोग्य अधिकारी,
    जिल्हा परिषद, रत्नागिरी

Breaking News

‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ च्या ‘प्रॅक्टिस रन’चा सोहळा

'कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७' च्या 'प्रॅक्टिस रन'चा सोहळापालकमंत्री...