भविष्यात कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार; पश्चिम रेल्वे मार्गावरून सुटणार एक्सप्रेस ट्रेन?
मुंबई- मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, ही मागणी रेल्वे खात्याकडून साफ फेटाळण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस ट्रेनचा मार्ग बदलला जाणार असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळात रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन बंद झाली होती. ही ट्रेन आता फक्त दिवा स्थानकापर्यंतच येते आणि तिथूनच सुटते. इतक्या लांब जाणे मुंबईतील प्रवाशांसाठी सोयीचे नसल्याने त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोकणातील पदाधिकारीही होते. खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्र्यांना रत्नागिरी-दादर किंवा सीएसटीएम अशी ट्रेन सुरु करण्याच्या मागणीचे पत्र रेल्वे दिले. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अशी सेवा सुरु करणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले.
त्यामुळे रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन आता दादर स्थानकापर्यंत येण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. रवींद्र वायकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेली माहिती आणखीच चक्रावणारी होती. त्यांनी सांगितले की, सध्याची रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही आता पश्चिम रेल्वेमार्गावरुन बोरिवलीहून वसईला जाईल. पुढे वसईवरुन पनवेलमार्गे ही ट्रेन कोकणात जाईल. आता दादर-रत्नागिरी ट्रेन सुरु करणे शक्य नाही. दीड ते दोन वर्षात नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस ट्रेन या नव्या मार्गानेच जातील. पुढील एक-दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्याला नवीन मार्ग मिळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये राजकारण आणू नये, असे आवाहन खासदार रवींद्र वायकर यांनी केले.
