भारतीय संविधान अमृतमहोत्सव रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता हॉटेल विवेक येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्नजी वराळे, न्या श्रीराम मोडक, महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल ॲड. मिलिंद साठे, जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी दिली.
जगातील सर्वात मोठे असलेले भारतीय संविधान राष्ट्राची कोनशिला आहे. भारतीय राज्यघटना सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज आहे.
कुठल्याही संविधानाचे सरासरी आयुष्य वीस वर्ष आहे; मात्र भारतीय संविधानात ७५ वर्षे उलटूनही आज १४५ कोटी भारतीयांना एकत्र बांधण्याची ताकद आहे.
संविधानाचा पहिला मसुदा १८९५ साली तयार झाला, त्याचे अभ्यास करते होते लोकमान्य टिळक. १९१९ साली केवळ ३ टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. साऊथ गोरस कमिटीसमोर ऐतिहासिक साक्ष डॉ. आंबेडकर यांनी दिली आणि मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त लोकांना मिळाला पाहिजे, महिलांनाही मतदानाचा अधिकार असला पाहिजे असे म्हणणे मांडले. त्याकाळी अमेरिकेतही महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांची दूरदृष्टी म्हणजे काळाच्या पुढे असल्याचे निदर्शक होते. भारतीय लोक आणि पक्ष कसे वागतात यावर संविधानाचे भवितव्य अवलंबून आहे हे डॉ. बाबासाहेबांनी सांगितले होते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
या पत्रकार परिषदेला ॲड. निनाद शिंदे, ॲड. शाल्मली आंबुलकर, ॲड. रत्नदिप चाचले, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. राहूल चाचे आदी मान्यवर उपस्थित होते.
