विलास राऊत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निष्फळ; संरक्षक भिंतीअभावी राऊतवाडीतील घरे आणि शेती धोक्यात-
👉राजापूर तालुक्यातील आंगले गावातील वरची राऊतवाडी येथील रहिवासी सीताराम राऊत यांच्या घराला गेल्या अनेक वर्षांपासून भूस्खलनाचा धोका निर्माण झाला होता. ओढ्यालगत असलेला संरक्षक कठडा ढासळत असल्याने वाडीच्या दोन्ही बाजूंनी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्यात यावी, यासाठी शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री, तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय विभागांकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षक कठडा कोसळून घराला गंभीर धोका निर्माण झाला असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे घरालगतची जमीन मोठ्या प्रमाणात खचली असून ओढ्याच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे संरक्षक कठडा पूर्णपणे कोसळला आहे. त्यामुळे घराचा पाया धोक्यात आला असून आणखी पाऊस झाल्यास घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत, तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री मा. अनिल पाटील, तसेच तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली होती. संरक्षक भिंत उभारण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली, पत्रव्यवहार करण्यात आला आणि सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. काही वर्षांपूर्वी या कामाचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात पाठविण्यात आला होता; मात्र निधीअभावी हा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने कामाला मंजुरी मिळू शकली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
वेळेत या कामाला मंजुरी देऊन संरक्षक भिंत उभारण्यात आली असती, तर आज घरांवर आणि शेतीवर ओढवलेले संकट टाळता आले असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज अनेक कुटुंबांवर भीतीचे सावट असून भविष्यात आणखी पाऊस झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा, बाधित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, तात्पुरत्या स्वरूपात संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात तसेच आंगले गावातील राऊत वरचीवाडी येथे ओढ्यालगत वाडीच्या दोन्ही बाजूंनी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी केली आहे. तसेच भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा अधिक वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
