इतिहास की मनगढंत कथा? शिवरायांबद्दल बेजबाबदार वक्तव्यांवर संताप
नागपूर येथे २४ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात हिंदी कथा वाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात मांडलेली कथित संवादकथा केवळ ऐतिहासिकदृष्ट्या आधारहीन नसून, ती शिवचरित्राचा अवमान करणारी असल्याचा आरोप विविध स्तरांतून केला जात आहे.
शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार समर्थ रामदासांना सोपवण्याची विनंती केली आणि स्वतःला त्यांचा ‘शिष्य’ म्हणून संबोधले. या कथनावरून प्रचंड वाद निर्माण झाला असून इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींनी या विधानाची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.
शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा) आक्रमक निषेध
या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वड नाका शाखेने संतप्त प्रतिक्रिया नोंदवत निषेध व्यक्त केला. संबंधित वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबा यांच्या फोटोला चपलांचा हार घालून सार्वजनिक निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच परिसरात निषेधाचे बॅनर लावण्यात आले.
चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख श्री. महादेव उर्फ बाळा कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संदर्भात कोणतीही विधाने करताना अभ्यास, संदर्भ आणि ऐतिहासिक पुराव्यांची जबाबदारी पाळलीच पाहिजे. बिनबुडाच्या कथा सांगून जनतेची दिशाभूल करणे अजिबात सहन केले जाणार नाही.”
इतिहास की कल्पनारंजन?
इतिहास हा भावना उकळवण्यासाठी वापरायचा विषय नाही तर तो पुराव्यांवर उभा असलेला शास्त्रीय अभ्यास आहे. शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्याबाबत मनमानी कथा रंगवणे ही केवळ अज्ञानाची नव्हे, तर जबाबदारीशून्यतेचीही पातळी आहे.
आज सोशल मीडियाच्या युगात अशा कथनांना लगेच प्रसिद्धी मिळते, पण त्याचवेळी चुकीचा इतिहास लोकांच्या मनात खोलवर रूजण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच अशा विधानांकडे केवळ “मत” म्हणून न पाहता, त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक ठरते.
‘जुनी शिवसेना’ दाखवण्याचा इशारा
या प्रकरणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “आता पुढे अशा प्रकारच्या शिवरायांच्या अपमानावर जुनी शिवसेना काय आहे, हे दाखवून दिले जाईल.”
या निषेधावेळी क्षेत्रप्रमुख श्री. महादेव उर्फ बाळा कदम, विभागप्रमुख श्री. बंधू कदम, शाखाप्रमुख श्री. मंदार शिंदे, युवासेना उपशहर अधिकारी श्री. आकाश कदम, विभागप्रमुख श्री. आयुष कुबडे, युवासेना शाखाप्रमुख श्री. राहुल गुरव तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री. बापू कदम, श्री. पिंट्या कोवळे, श्री. सुनील पिंगे, श्री. वीर जगदाळे, श्री. साई कदम व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत ते विचार, मूल्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याचा उल्लेख करताना तथ्यांची पायाभरणी आणि अभ्यासाची शिस्त आवश्यक आहे. अन्यथा, इतिहासाच्या नावाखाली सुरू होणारे हे “कल्पनारंजन” समाजात संभ्रम आणि संताप दोन्ही निर्माण करत राहील.
इतिहासाला हात घालताना जबाबदारीची जाणीव हवी नाहीतर जनतेचा रोष अनिवार्य आहे.
