रत्नागिरी नगरपरिषदेत घडलेल्या उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणासंदर्भात आज भारतीय जनता पार्टी नगरसेवकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणावर तात्काळ व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी महिला जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेविका सौ वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे उपनगराध्यक्ष समिर तिवरेकर गटनेता राजू तोडणकर नगरसेवक नितीन जाधव सौ मानसी करमरकर सौ सुप्रिया रसाळ संदीप ( बाबू ) सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नगरपरिषदेमध्ये शिस्त, सुसंस्कृत राजकारण आणि लोकशाही मूल्यांचे पालन होणे आवश्यक असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधितांवर त्वरित चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले.
दरम्यान या प्रकरणावर न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले
