उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; शंभुराज देसाई, उदय सामंत अन् दादा भुसेंकडे नवी जबाबदारी..
नगर विकासची जबाबदारी उदय सामंतांकडे
मुंबई :- अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेले राज्यातील हे पहिलेच अधिवेशन आहे. सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, सोमवार पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनी अधिवेशन काळात त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यतील महायुती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात आली आहे. यंदा अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडील असलेल्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवत असल्याचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. नगर विकास विभागाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे.दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला असून या प्रस्तवावर विधानसभेत चर्चा सुरु आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून दिला आहे.
