रत्नागिरी, दि.३० (जिमाका) :- पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तब्बल 2 तास अतिशय सूक्ष्मपणे आपत्ती व्यवस्थापनची आढावा बैठक घेतली. एनडीआरएफचा कायमस्वरुपी तळ रत्नागिरीत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रस्ताव तयार करुन पाठपुरावा करावा. त्यासाठी जागा दिली जाईल, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी बैठकीत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्ह्यात झालेला पाऊस, शेती, घर, गोठ्यांचे झालेले नुकसान, मनुष्यबळ हानी, प्रशासनामार्फत करण्यात आलेली मदत, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, धरणांची सद्यास्थिती, खते, बी-बियाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, धोकादायक शाळा, अंगणवाडी नुकसान, पाणी पुरवठा, नद्यातून गाळ काढणे, औषध साठा, आरोग्य सुविधा, साकव, नगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग याबाबतचा बारकाईने आढावा घेतला.
पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने मदतीची कार्यवाही करावी. आरोग्य विभागाने साथीचे रोग, स्नेक बाईट याबाबत औषधाचा साठा पुरेपुर राहील याची जबाबदारी घ्यावी. प्रलंबित शवविच्छेदन अहवाल तातडीने द्यावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. टाळाटाळ आढळून आल्यास अथवा कोणीही गैरव्यवहार करत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही.
कोकण रेल्वेने सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या छतावरील गळके पत्रे तातडीने बदलले पाहिजेत. त्याबाबत कार्यवाही करावी. एसटी विभाग नियंत्रकांनी देखील बसस्थानके स्वच्छ राहतील. विशेषत: स्वच्छतागृहे निटनेटकी राहतील याची खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मनावर घेऊन काम करावे. रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची दुरुस्ती, चिखलाची साफसफाई करावी. नवीन पत्र्याचा वापर करुन, तात्परते पिकअप शेड उभे करावेत. महावितरणने वाड्यांचा सर्वे करुन सिंगल फेज वरुन थ्री फेजवर करण्याबाबत मिशन हाती घ्यावे. धरण लाभ क्षेत्रात किती लोक राहतात, आपत्कालीन परिस्थितीमध्ये किती जणांचे स्थलांतर करावे लागेल, याबाबत नियोजन आतापासूनच करावे. दरडप्रवण क्षेत्राबाबतचेही नियोजन असावे. चांगल्या शाळा निवारा म्हणून वापरता येतील. त्याची तयारी करावी.
अतिधोकादायक, धोकादायक शाळांची यादी करा. त्याबाबतचा अहवाल द्या. दुरुस्तीसाठी प्राधान्य दिले जाईल. कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर बियाणे आणि खते देण्यासाठी यंत्रणा राबवावी. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
अधिकाऱ्यांनी फोन उचलले पाहिजेत
इथून पुढे 4 महिने सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांनी सतर्क रहायला हवे. अत्यावश्यक कारणाशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रजेवर जाऊ नये तसेच मुख्यालय सोडू नये. बरेच अधिकारी फोन उचलत नाहीत. गायब असतात. अशांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांनी आलेला फोन उचलला पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.
000