ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या (GCC) माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक आधुनिक तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नवी दिशा देणाऱ्या जी. सी .सी. ( GCC) लीडरशिप परिषदेचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना, महाराष्ट्राकडे कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, उत्पादन, वित्तीय सेवा, संशोधन-विकास, शैक्षणिक संस्था आणि मजबूत पायाभूत सुविधा अशी GCC साठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक संस्था आहे. या सामर्थ्याच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील औद्योगिक व GCC क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र बनविण्याच्या दृष्टीने या परिषदेला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रात अधिकाधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आणि उच्च मूल्यवर्धित गुंतवणूक यावी, यासाठी राज्य शासन आणि उद्योग विभागाची भूमिका सदैव सकारात्मक आणि उद्योगपूरक राहील. GCC क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संबंधित घटकांची समिती स्थापन करून त्यांच्या सूचनांच्या आधारे विद्यमान धोरणांचा आढावा घेण्यात येईल. GCC च्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणा, नियमांमध्ये आवश्यक बदल, परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करणे तसेच उद्योगांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, असेही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्पष्ट केले.
“उद्योगांनी महाराष्ट्राकडे केवळ गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून नव्हे, तर आपल्या जागतिक क्षमतांच्या विस्तारासाठी विश्वासू भागीदार म्हणून पाहावे,” या भूमिकेतून शासन उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. जलद मंजुरी, सिंगल विंडो सुविधा, पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार सुलभीकरण तसेच उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
GCC च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण अभियंते, पदवीधर, संशोधक आणि कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून, उद्योगांच्या भविष्यातील गरजांनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत केले जाईल अशी ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिलीं
यावेळी ॲड. निलेश देशमुख, श्री. मनोज कुमार सिंह, श्री. शम्मी प्रभाकर सिंह, श्रीमती आयुषी प्रभाकर, श्री. संदीप पोद्दार, श्री. अरिंदम बॅनर्जी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
