दीप अमावस्येनिमित्त नाखरे कालकरकोंड शाळेत संस्कारांची ‘दीपज्योत’
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, नाखरे, कालकरकोंड येथे आषाढ अमावस्येनिमित्त ‘दीपपूजा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी तसेच महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शहरी भागापासून अत्यंत दूर असलेल्या या परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीतील सण, परंपरा आणि त्यामागील जीवनमूल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. आपल्या परंपरांकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यामागील विचार आणि संस्कार विद्यार्थ्यांना समजावेत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
आषाढ अमावस्येला ‘दीप अमावस्या’ किंवा ‘दिव्यांची अमावस्या’ असे म्हटले जाते. या अमावस्येनंतर श्रावण मास सुरू होतो. श्रावण म्हणजे सणांचा राजा. पावसामुळे निसर्ग बहरलेला असतो. झाडं-वेली पानाफुलांनी सजलेली असतात. शेतीची कामे आटोपल्यानंतर विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने मनाला आनंद देणारा हा काळ असतो.
तमाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा हा सण म्हणजे दीप अमावस्या, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. दिवा हा आपल्या संस्कृतीत तेज, ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. बाहेरचा अंधार दूर करणाऱ्या दिव्याप्रमाणेच आपल्या मनातील अज्ञान आणि नकारात्मक विचारांचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणे आवश्यक आहे, हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
श्रावण महिन्यापासून चातुर्मासालाही सुरुवात होते. या चार महिन्यांच्या काळात शरीर आणि मनाला शिस्त लावण्यासाठी एखादा नेम घेण्याची परंपरा आहे. चांगल्या सवयी अंगीकारणे, संयम पाळणे आणि मनाला सकारात्मक विचारांची दिशा देणे, हा या परंपरेमागील विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
दुर्गम भागातील मुलांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, तसेच त्यातून शिस्त, ज्ञान, संस्कार आणि सकारात्मक जीवनमूल्ये त्यांच्यामध्ये रुजावीत, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत महिला पालकांनीही सहभाग घेतल्याने या उपक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
या उपक्रमाचे आयोजन वैदेही जोशी, उमेश लिंगायत आणि अनंत कदम या शिक्षकांनी केले.
एका दिव्यापासून दुसरा दिवा पेटतो आणि प्रकाश वाढत जातो; त्याचप्रमाणे ज्ञान आणि संस्कारांची ज्योत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत राहावी, हा संदेश या दीपपूजेच्या माध्यमातून देण्यात आला.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडणारा आणि परंपरांमागील मूल्यविचार समजावून देणारा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, नाखरे कालकरकोंडवाडी येथील हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
