काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाची ठिणगी पडली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि योगदानाच्या स्मृती जाग्या झाल्या.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजवर देशासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ जवानांना वीरमरण आले. एकूण ३ हजार ७८३ माजी सैनिकांची नोंद असून ३ हजार ९२९ विधवा आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ही आकडेवारी मिळाली.
स्वातंत्र्यलढ्यात जसे रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान आहे तसे स्वात्रंत्र्यप्राप्तीनंतर हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्यात भरती झाले आहेत. वेळप्रसंगी बलिदानही दिले आहे तर काही जखमी झाले आहेत. आजही हजारो तरुण सैन्य दलात कार्यरत आहेत. देशसेवा करताना ३५ जवान ठिकठिकाणी शहीद झाले. त्यात ३ वीरपुत्रांचा समावेश आहे.
