रत्नागिरी (जिमाका) : ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी दिल्या.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्र. प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, प्रातांधिकारी जीवन देसाई, राहुल पंडित, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
यावेळी मंडणगड न्यायालयीन इमारत बांधकामबाबत सुरु असलेल्या कामाची माहिती अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी संगणकीय सादरी करणाद्वारे दिली. कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, चिपळूणचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे, उपअभियंता जनक धोत्रेकर आदी संबंधित उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सुरुवातीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा आढावा घेतला. प्रकल्प संचालक श्री. जाधव यांनी रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना या योजनेंतर्गत असलेले उद्दिष्ट, मंजूर प्रकरणे, योजनेंतर्गत देण्यात येणारा हप्ता, योजनेंतर्गत पूर्ण घरे, अपूर्ण घरे आदींची सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, घरकुल योजनेचा लाभ देत असताना नागरिकांना ज्या अडचणी येतात, त्या सोडविण्यासाठी काम करा. काही कारणास्तव ज्यांची प्रकरणे नामंजूर होतात, त्यांना पत्राने कळवावे. घरकुल आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात चांगलं काम होत आहे. सरकार करीत असलेले हे काम जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. जिल्हा दौऱ्यावर असताना या योजनेंतर्गत बांधण्यात आलेली घरे आपल्याला दाखवावीत.
नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या 5 हाऊस बोट, टुरिस्ट बस, महिला बचत भवनबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, ज्या ठिकाणी पर्यटकांना येणे-जाणे सोईचे आहे, अशा ठिकाणी हाऊस बोट ठेवाव्यात. हाऊस बोटी चालविण्याबाबत प्रशिक्षण देणेही गरजेचं आहे. हाऊस बोटीसंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. महिलांना आवश्यकतेनुसार आणखी टुरिस्ट बस उपलब्ध करुन देता येतील.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, एसटी बसेस नियमित वेळापत्रकानुसार सुटतील याची दक्षता घ्या. शाळा सुटण्याच्या वेळेला बसेस सोडा. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी माहिती दिली.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शहरातील होर्डींग्जसंदर्भात आढावा घेतला. अधिकृत होर्डींग, अनधिकृत होर्डींग, काढण्यात आलेल्या होर्डींग संदर्भात मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी माहिती दिली. शहरातील होर्डींग्जची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी यांनी समन्वय साधावा. यामध्ये होर्डींग मालकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. याबाबत शुक्रवारी आढावा घेऊ, असेही ते म्हणाले.