महसूल दिन कार्यक्रम ; सकारात्मक दृष्टीकोण ठेवून कामकाज पूर्ण करा ,वेळेच्या आधी काम करुन समाजामध्ये विश्वास अधिक दृढ करा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : समाज विश्वासावर आधारित असतो. महसूल यंत्रणेकडे येणारे काम प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ते पूर्ण करावे. सेवा हमी कायद्यावर भर देताना दिलेल्या वेळेच्या आधी सर्वसामान्य नागरिकांचे काम पूर्ण करुन त्यांच्यामध्ये विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल दिन कार्यक्रम झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, मुद्रांक जिल्हाधिकारी विरसिंह वसावे, भूमिअभिलेख अधिक्षक सचिन इंगळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दर महिन्याला सरासरी 30 हजार दाखल्यांचे वितरण आपल्याकडून होत असतं. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी तसेच आपले सहकारी, आपले कनिष्ठ या सर्वांसोबत आदरपूर्वक संवाद साधला पाहिजे. समाज विश्वासावर आधारित निर्माण होत असतो. आपण आपल्या कामांमधून तो अधिक दृढ केला पाहिजे.
ऑनलाईन, ई ऑफीस यामुळे अधिक सुविधा कामकाजामध्ये होत आहेत. महसूल विभागात आपल्या जिल्ह्यात 60 टक्के महिलां अधिकारी-कर्मचारी प्रमाण आहे. कौटुंबिक जबाबदारीबरोबर कार्यालयीन जबाबदारी त्या उत्तमरित्या सांभाळत आहेत. त्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन करतो. दैनंदिन जीवनात शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य उत्तम राखले पाहिजे. त्यासाठी दररोज तशी कृती आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून होणाऱ्या कामामुळे समोरच्याला समाधान मिळते आणि हे समाधान आपल्याला आनंद देवून जाते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आनंद देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
मिळणाऱ्या पगारातून योग्य अर्थिक नियोजन व्हायला हवे. बचत किती आणि कशी करावी, खर्च किती असावा, विमा, राखीव तरतूद या सर्वांची साक्षरता करण्याच्या दृष्टीकोनातून एक कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जाईल. येणाऱ्या महसूल वर्षात आपण सर्वांनी चांगले काम करु या आणि तुम्ही सर्वजण करणार आहात, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य माणसाचे समाधान हे फार महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षभरात आपण काय केले, मी नागरिकांना किती समाधान दिले, याचे मुल्यमापन तुम्ही करावे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू ठेवलेला आहे. त्यामुळे त्याचे समाधान करणे, त्याला सेवा देणे, त्याचे ऐकून घेणे, त्याच्याशी सुसंवाद साधणे, त्याचे कामकाज सुसह्य होईल, असा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन असायला हवा.
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सविस्तर प्रास्ताविक करुन माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन आणि गणेश वंदनेने झाली. तहसिलदार संजय भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळ अधिकारी अर्चना पटवर्धन यांनी केले.
महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार
अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, तहसिलदार संजय भालेराव, नायब तहसिलदार दीपक कुळ्ये, लघुलेखक अमोल पाळेकर, सहाय्यक महसूल अधिकारी अभिजीत शेट्ये, महसूल सहाय्यक अजित पिलणकर, वाहनचालक अल्लाउद्यीन तडवी, शिपाई विलास पागडे.
क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी
उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसिलदार प्रविण लोकरे, नायब तहसिलदार अनिल गोसावी, सहाय्यक महसूल अधिकारी माधवी दाभाडे, मंडळ अधिकारी संतोष गंगाराम पांचाळ, महसूल सहाय्यक प्रविण प्रकाश सावंत, ग्राममहसूल अधिकारी हर्षुला पांडुरंग बोरसा, वाहनचालक नंदकुमार अनंत कदम, शिपाई शैलेश अनंत सपाटे, पोलीस पाटील मनोहर पांडुरंग दळवी, महसूल सेवक राहुल रविंद्र महागावकर
गुणवंत पाल्य – उच्च माध्यमिक (इ. 12 वी)
माविया समीर सावंत, वैष्णवी संदीप आयरे
माध्यमिक (इ.10 वी)
चिन्मय प्रकाश टिपुगडे, मृण्मयी मनोज ठसाळे, पार्थ प्रकाश झोरे,अजिंक्य योगेश आपटे, शौर्य चंद्रकांत सानप, वेदांत समीर शेट्ये, प्रियल हणमंत ऐवळे, वेदांत जयंत राऊत, अन्विका अमोल गर्दे
महसूल दिन कार्यक्रम ; सकारात्मक दृष्टीकोण ठेवून कामकाज पूर्ण करा ,वेळेच्या आधी काम करुन समाजामध्ये विश्वास अधिक दृढ करा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
