रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित हस्तलिखित प्रकाशन सोहळा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
खंडाळा : आजच्या प्रगत प्रसारमाध्यमांच्या काळात प्रत्येक वयोगटातील विद्यार्थी मोबाईल, टी. व्ही. च्या धोकादायक विळख्यात अडकला आहे. अशावेळी विद्यार्थी या साधनांच्या विळख्यात अडकू नये यासाठी त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करता याव्यात यासाठी वाटद कवठेवाडी शाळेत राबविण्यात येणारा हस्तलिखित उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलत होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे. वाटद कवठेवाडी शाळेचे विविध उपक्रम हे अत्यंत प्रभावीपणे आहेत. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार आणि त्यांच्या आवडीनुरूप शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. आज समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी ज्या क्षेत्रात ते करिअर करणार आहेत, त्या क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. पालकांनी आणि शिक्षकांनी याकामी आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे असे आवाहन करतानाच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या हस्तलिखित, झाडांचे बारसे, परसबाग, विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमाचे नियोजन करत विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित असणारे कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी मागील अनेक वर्षे शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत, अत्यंत ग्रामीण भागात लोकांच्या सहकार्यातून शाळा परिपूर्ण बनवता येते हे वाटद कवठेवाडी शाळेने दाखवून दिले असल्याने येथील शाळेला शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याबद्दल त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाचे अभिनंदन केले. तसेच आबा सुर्वे, डॉ. राजेश जाधव, केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांनीही या कार्यक्रमात या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या लेखणीतून साकारलेले अक्षरांकुर या नावाचे हस्तलिखित प्रकाशित करण्यात आले. तसेच या शैक्षणिक वर्षातील विविध स्पर्धा, परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि शाळेच्या मदतीसाठी ज्यांनी – ज्यांनी हातभार लावला आहे अशा देणगीदारांना माननीय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृतमहोत्सवी संविधान निर्मिती वर्षानिमित्त संविधान जागर रॅली आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेंतर्गत फेरी काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या रॅलीत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर धोपट यांनी निवेदन माधव अंकलगे यांनी केले.
यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील, सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक शेखर खेऊर, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव, केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वाती धनावडे, सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा सुवर्णा धनावडे, शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, सहशिक्षिका राधा नारायणकर यांच्यासह वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी आणि वाटद धोपटवाडी मधील ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.