रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात ‘उमेद’चा माध्यमातून १ लाखाहुंन अधिक महिला बनल्या ‘लखपती दीदी

रत्नागिरी जिल्ह्यात ‘उमेद’चा माध्यमातून १ लाखाहुंन अधिक महिला बनल्या ‘लखपती दीदी

रत्नागिरी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख २५ हजार ८५६ महिलांनी ‘लखपती दीदी’ हा मान मिळवला असून, प्रशासनाने ठरवलेले उद्दिष्ट लक्षणीयरीत्या ओलांडले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास साधणे, आर्थिक स्वावलंबन घडवणे आणि त्यांना उद्यमशील बनवणे हा शासनाचा प्रमुख हेतू आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजारांहून अधिक स्वयंसहाय्यता समूह स्थापन झाले असून, या समूहांमध्ये सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक महिलांचा सक्रिय सहभाग आहे.

स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास आणि क्षमता बांधणी यावर विशेष भर देण्यात येत आहे. याच प्रक्रियेतून अनेक महिलांनी स्वतःचे लघुउद्योग उभारले असून, शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहेत.

जिल्ह्यात सुरुवातीला १ लाख १० हजार ३५९ महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र महिलांचा वाढता सहभाग, प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी आणि समुदाय संसाधन व्यक्तींचे (CRP) मार्गदर्शन यामुळे प्रत्यक्षात १ लाख २५ हजार ८५६ महिलांनी हा टप्पा गाठला आहे.

या अभियानाचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी उमेदअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाची सदस्य असणे आवश्यक आहे. जिल्हा व तालुका पातळीवरील अभियान व्यवस्थापन कक्ष तसेच CRP यांच्या मदतीने महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उमेद अभियान महिलांसाठी आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

Breaking News