रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : सर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती दिवसात झाली याचे ट्रॅकींग व्हावे. जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली विकास कामे, रुग्णवाहिकांचा सरासरी वेळ, रस्त्यांची दर दिवशीची स्थिती अशी जिल्ह्यातील प्रत्येक विभागाची माहिती एका क्लिकवर जनतेला मिळावी, त्यासाठी जिल्ह्याचा एकत्रित डॅशबोर्ड तयार करा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब लंगाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्याचा सर्व विभागांच्या एकत्रित माहितीचा डॅशबोर्ड तयार करावा. पेपरलेस कार्यप्रणाली राबविण्याच्या दृष्टीकोनातून हा डॅशबोर्ड असावा. लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली कामे, मागणीपत्रावर अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही लोकांना समजली पाहिजे. स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी पोलीस, 18 वर्षाआतील, 18 वर्षापुढील याबाबतची माहिती क्षणार्धात वापरकर्त्याला मिळायला हवी. रुग्णवाहिकेला कॉल गेल्यानंतर अंतर लांब असेल तर 45 मिनिटात त्या रुग्णावर उपचार व्हायला हवेत. शहरी भागात हाच कालावधी 15 मिनिटावर यायला हवा. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पोलीस विभागाशी चर्चा करुन रुग्णवाहिकांचे ठिकाण ठरवावे.
हब कॉम टेक्नोसिस्टीमचे आदेश सुर्वे यांनी या डॅशबोर्डबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्राणीसंग्रहालयाच्या कामास गतीने सुरुवात हवी
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाबाबत आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, सद्या पावसाळा सुरु आहे. या कालावधीत जे प्रशासकीय कागदपत्रीय कामकाज राहिले असेल, ते पूर्ण करुन घ्यावे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात गतीने कामकाजाला सुरुवात व्हायला हवी. त्याबाबतचे सादरीकरण मुंबई येथे करावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.
000
सर्व विभागांची एका क्लिकवर माहिती देणारा जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड तयार करालोकप्रतिनिधींच्या निधीतील विकासाची कामे, सद्यस्थिती माहितीसहा सर्वसामान्यांच्या पत्रावर झालेली कार्यवाहीचे ट्रॅकींगही हवे-पालकमंत्री डॉ. उदय सामंत
