रत्नागिरी, दि. 3 (जिमाका):- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य असल्याने स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
सर्व स्कूल बस चालक व मालक यांनी आपल्या स्कूल बस वाहनांची सर्व कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, चालकाची अनुज्ञप्ती व बॅच वैध असल्याशिवाय विद्यार्थी वाहतुकीसाठी वाहन रस्त्यावर वापरु नये.
स्कूलबस वाहनांची कागदपत्रे विधीग्राह्य करण्याकरिता सादर करण्यात आलेल्या अर्जांना परिवहन कार्यालयातर्फे प्राधान्य देण्यात येत असून सर्व स्कूल बस धारकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापन व पालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक अनधिकृत, अवैध किंवा धोकादायक पध्दतीने होणार नाही. केवळ वैध कागदपत्रे असलेल्या सुरक्षित स्कूल बस मधूनच होईल, याची दक्षता घ्यावी.
स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यावाहनांवर विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करणार- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे
