रत्नागिरी1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून...

1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहास—-

1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहास—-
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान—
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान!कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान ‘, अशी ज्या राज्याची ओळख करून दिली जाते असं हे देशाच्या नकाशावरील ठसठशीत दिसणारं राज्य*.
1 मे हा दिवस या राज्यासाठी अतिशय खास, कारण हा दिवस आहे, महाराष्ट्र दिनाचा. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1960 मध्ये म्हणजेच 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती आणि याच दिवशी महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील करण्यात आली होती.

राज्य पुनर्रचना कायदा

ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारांतून भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला खरा, मात्र राज्यांची निर्मिती झाली नव्हती, पुढे भाषा आणि प्रदेशांच्या आधारावर राज्य निर्मितीली सुरुवात झाली आणि यामध्ये मद्रासच्या तेलुगू भाषिक भागांमध्ये मोठं आंदोलन होत 1953 मध्ये आंध्र राज्याची निर्मिती होत देशभरात याचे परिणाम पाहायला मिळाले. राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात होत 1956 मध्ये संसदेनं राज्य पुनर्रचना कायदा संमत केला आणि भारतीय राज्यांच्या सीमा पुन्हा रेखाटण्यात आल्या.

वास्तविक राज्य पुनर्रचना कायदा 1956 अन्वये देशात अनेक राज्य भाषेच्या आधारावर निर्माण झाली. कन्नड भाषिकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आलं. तेलुगू भाषिकाना आंध्र प्रदेश राज्य मिळालं, दरम्यानच्याच काळात तमिळ भाषिकांना तामिळनाडू, मल्याळम भाषिक नागरिकांना केरळ राज्य मिळालं.या साऱ्यामध्ये मराठी आणि गुजराती भाषिकामंना मात्र वेगळं राज्य मिळालं नाही.

….आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली

पुन्हा एकदा कायद्याकडे वळू, राज्य पुनर्रचना कायद्यान्वये मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या. या सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट्र गुजारतपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली आणि या द्विभाषिक नागरिकांचा मुंबई प्रांतात समावेश झाला. यामध्ये मराठी, कच्छीसोबतच कोकणी भाषा बोलणाऱ्या समावेश होता. काळ पुढे सरला आणि 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं डोकं वर काढलं. जिथं मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली.

महाराष्ट्राचे 106 हुतात्मे

गुजराती भाषिकांनीही स्वत:चं वेगळं राज्य हवं अशी मागणी करत चळवळ सुरू केली. अखेर आंदोलनं, सभा आणि चळवळींच्या परिणामस्वरुप 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत 1956 मध्ये मुंबईतच एक मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात 106 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता आणि इथूनच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला आणखी प्रखरपणे चालना मिळाली. हेच प्राण गमावणारे कार्यकर्ते ठरले महाराष्ट्राचे 106 हुतात्मे.

मुंबईवरून वादाची ठिणगी

दोन राज्य वेगळी झाली मात्र मुंबईवरून वादाची ठिणगी धुमसतच होती. बहुतांश नागरिक मराठी असल्यानं मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे असं अनेकांचं मत, तर शहराच्या प्रगतीत गुजराती समुदायाचा वाटा असल्यानं मुंबई आपल्या राज्यात अर्थात गुजरातमध्ये यावी असं त्यांना वाटत होतं. मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करावं अशी मागणी करणारा एक वर्गही होताच. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने ही मागणी नाकारत कडाडून विरोध करत मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्याची मागणी केली.

शेवटी मुंबई महाराष्ट्राची झाली

संयुक्त महाराष्ट्रासाठी 1956 ते 1960 दरम्यान चळवळ आणखी तीव्र झाली आणि तत्कालीन कम्युनिस्ट, समाजवादी नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी उचलून धरली. शेवटी या मागणीला आणि लढ्याला यश मिळून मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला आणि तिथपासून मुंबई ही महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग झाली, जगभरात या लखलखत्या मुंबईचीच चर्चा आणि नावलौकिक पाहायला मिळाला. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते अगदी सध्याच्या दिवसापर्यंत या राज्यानं बराच मोठा पल्ला गाठला.

Breaking News