12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत
सामोपचाराने वाद मिटवण्याचे आवाहन
रत्नागिरी, (जिमाका):- राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोक अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
आपली प्रकरणे लोक न्यायालयात ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपले वकील, संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
लोक न्यायालयात प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स्, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणा अंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
