मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांची घोषणा
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित करण्यात आले. तसेच, कवितेच्या एका दालनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची उपस्थिती लाभली.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विशेषतः, शालेय विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करणारी होती.
शिरवाडे वणी आता “कवितांचे गाव” म्हणून ओळखले जाणार असल्याने गावकऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक असून त्यांनी हाती घेतलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरेल, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले. साहित्यिकांसाठीही ही एक प्रेरणादायी गोष्ट असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी असा उपक्रम राबविला गेला, हे मराठी भाषा मंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे देखील मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नमूद केले.
या प्रसंगी मंत्री दादाजी भूसे, दिलीपकाका बनकर, शोभा बच्छाव, हेमंत टकले, भाऊ चौधरी तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नात पियू शिरवाडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.