वाचनालयामुळे वाचकांमध्ये सर्जनशीलता, गंभीर विचार आणि वाचनाची आवड वाढते तसेच वाचन संस्कृती जोपासण्यामध्ये वाचनालय मोलाची भूमिका बजावते. अशा या ज्ञानस्रोताची काळजी घेतली, तरच भविष्यात भावी पिढीला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे हा ज्ञानस्रोत जपणे, वाढवणे गरजेचे आहे असे मत माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज रत्नागिरी येथे व्यक्त केले आहे
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे १९७ वर्षांपासून चालत आलेले महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय आहे. या वाचनालयाच्या नवीन वास्तूच्या बांधकामाची आज आमदार रवींद्र चव्हाण पाहणी केली. या वास्तू उभारणीचे वेगाने होत असलेले काम बघून मनाला समाधान मिळाले अशी भावना व्यक्त केली. या नगर वाचनालयात श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक भव्य सभागृह उभारले जात आहे. १ लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा असलेले हे वाचनालय द्वीशताब्दी वर्ष समारंभापूर्वी जनतेच्या सेवेत पुन्हा सुस्थितीत उभे असेल!
आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज रत्नागिरी नगर वाचनालयाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली या पाहणी दौऱ्याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, हेमंत रेडीज, आनंद पाटणकर आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
