मुंबई-विजयदुर्ग जल प्रवासाचा श्रीगणेशा १ मार्चपासून ‘रो-रो’ फेरी सेवा सुरू होणार– पहिल्याच बोटीतून सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे करणार प्रवास— या बोटीची सुविधा रत्नागिरीकरांसाठी कधी मिळणार याकडे लागले सर्वांचे लक्ष—
कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते विजयदुर्ग या जलमार्गावर अखेर बहुप्रतिक्षित ‘रो-रो’ फेरी सेवा सुरू होत असून, १ मार्च २०२६ पासून या सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास आता अधिक सुखकर, वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
या नवीन जलमार्गाचे उद्घाटन विशेष उत्साहात होणार आहे. सेवेच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच १ मार्च रोजी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे रीतसर उद्घाटन करणार आहेत.
‘एम२एम प्रिन्सेस’ (M2M Princess) ही बोट या मार्गावर धावणार असून प्रवासाचा कालावधी साधारण ७ तासांचा असेल.
मुंबई ते विजयदुर्ग: सकाळी ८:०० वाजता सुटणार, दुपारी ३:०० वाजता पोहोचणार.विजयदुर्ग ते मुंबई: दुपारी १२:०० वाजता सुटणार, सायंकाळी ७:०० वाजता पोहोचणार.
मार्च महिन्यातील फेऱ्यांचे नियोजन खालील प्रमाणे असेल.मार्च महिन्यात एकूण १६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबईहून सुटण्याचे दिवस: १, ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च.
विजयदुर्गहून सुटण्याचे दिवस: २, ५, ८, १२, १५, १९, २२, २६ मार्च.
रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि लांब पल्ल्याच्या बस प्रवासाला हा एक उत्तम पर्याय ठरेल. जलमार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून यामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक व्यापारवृद्धीसाठी ही सेवा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सर्व प्रवाशांनी बोट सुटण्याच्या वेळेच्या किमान ९० मिनिटे आधी बंदरावर पोहोचणे बंधनकारक आहे. ही सेवा हवामान स्थिती आणि तांत्रिक मंजुरीच्या अधीन असेल.
