Home रत्नागिरी युवा पिढीला दिशा देणारे अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय

युवा पिढीला दिशा देणारे अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय

0
युवा पिढीला दिशा देणारे अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय

युवा पिढीला दिशा देणारे अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही कोकण व महाराष्ट्रात नावाजलेली शैक्षणिक संस्था असून तिच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे अभ्यंकर–कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा उल्लेखनीय प्रवास होय. १९२५ साली बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांनी केवळ तीन विद्यार्थिनींना प्रवेश देऊन सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या छोट्याशा उपक्रमातून या संस्थेची पायाभरणी झाली. सामाजिक व आर्थिक अडचणींवर मात करत १९३३ मध्ये संस्थेची अधिकृत स्थापना झाली आणि पुढे विविध शैक्षणिक शाखांद्वारे ती विस्तारत गेली.

याच शैक्षणिक परंपरेतून १४ जून १९७६ रोजी अभ्यंकर–कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली. १०+२+३ या नवीन शैक्षणिक रचनेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या महाविद्यालयात प्रारंभी कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये सुमारे ३५० विद्यार्थी होते. पुढे १९९२ मध्ये एम.सी.व्ही.सी. विभाग सुरू झाला आणि आज येथे सुमारे ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोकणासह महाराष्ट्रात दर्जेदार शिक्षण देणारे एक नामांकित कनिष्ठ महाविद्यालय म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.

महाविद्यालयाच्या विकासात दानशूर व्यक्तींचे मोठे योगदान आहे. आर. बी. कुळकर्णी यांच्या देणगीतून विज्ञान शाखेला त्यांचे नाव मिळाले, तर सुप्रसिद्ध व्यावसायिक अभ्यंकर कुटुंबीयांच्या योगदानामुळे कला व वाणिज्य विभागाला पी. जी. अभ्यंकर हे नाव देण्यात आले. २००१-०२ मध्ये रौप्य महोत्सव साजरा झाल्यानंतर महाविद्यालयाने सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावला आणि २०२६ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करताना ही वाटचाल अधिक तेजस्वी ठरली आहे.

सद्यस्थितीत महाविद्यालयात आधुनिक सुविधा, सुसज्ज इमारती, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह असे विविध शिक्षण पुरक गोष्टी उपलब्ध आहेत. येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. बदलत्या काळातील स्पर्धात्मक वातावरणाला सामोरे जाण्यासाठी संस्था सक्षमपणे कार्यरत आहे.

या यशस्वी प्रवासामागे सर्व संस्था पदाधिकारी, सर्व प्राचार्य उपप्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व देणगीदार यांचे एकत्रित योगदान आहे. अभ्यंकर–कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव हा केवळ एका संस्थेचा उत्सव नसून शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण समर्पण, परिश्रम आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

-श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्षा,
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here