रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० व्या पदग्रहण सोहळ्यात ॲड. मनीष नलावडे नूतन अध्यक्ष
सचिवपदी आनंद चौगुले, खजिनदारपदी धीरज वेल्हाळ यांची निवड!
रोटरी वर्ष २०२६-२७ ‘कर्तव्याचा जागर महोत्सव’ म्हणून साजरे होणार
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा ७० वा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी ॲड. मनीष नलावडे यांना रोटरीची मानाची कॉलर प्रदान करून अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. पुण्यातील रोटरी जिल्हा ३१३१च्या माजी जिल्हा गव्हर्नर मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. आनंद चौगुले यांची सचिवपदी, तर धीरज वेल्हाळ यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुण्या तथा पदग्रहण अधिकारी माजी जिल्हा गव्हर्नर मंजू फडके यांनी रोटरीची विचारसरणी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. “तुम्हीच तुमचे आणि तुमच्या संस्थेचे खरे ब्रँड प्रतिनिधी असता,” असे सांगत त्यांनी प्रत्येक सदस्याने आपल्या कृतीतून संस्थेची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आवाहन केले. रोटरीमध्ये अशाच व्यक्ती एकत्र येतात, ज्यांना समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची आवड आणि तळमळ असते. एकट्याने काम करण्यापेक्षा संघभावनेने एकत्र येऊन कार्य केल्यास समाजात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतो; या भावनेतून रोटरी सदस्य कार्यरत असतात, असे त्यांनी नमूद केले.
रोटरी सदस्यत्वाचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या, “आयुष्यात मौजमजा सर्वजण करतात; मात्र रोटरी सदस्य मौजमजेबरोबर सामाजिक भान जपत समाजासाठीही कार्य करतो.” नेतृत्वविकासाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, समस्या प्रत्येकालाच असतात; मात्र त्यांचा बाऊ न करता त्यावर उपाय शोधत पुढे जाणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. कॉफी तयार करणाऱ्या यंत्राचे उदाहरण देत त्यांनी नेतृत्वकौशल्याचे महत्त्व स्पष्ट केले. “माणूस तोच असतो; मात्र तुम्ही त्याच्याकडून काम कसे करून घेता, यावर तुमचे कौशल्य आणि त्या व्यक्तीचे कार्यपरिणाम अवलंबून असतात,” असे सांगत त्यांनी प्रभावी संवाद, प्रेरणा आणि संघभावना यांचे महत्त्व विशद केले.
नूतन अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत या परंपरेला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. अध्यक्षपद स्वीकारताना ते म्हणाले, “रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेली ७० वर्षे या क्लबने समाजसेवेची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे आणि त्या परंपरेला पुढे नेण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला विशेष अभिमान वाटतो.”
रोटरी इंटरनॅशनलच्या “Create Lasting Impact” आणि डिस्ट्रिक्टच्या “Team Phoenix” या संकल्पनांना अनुसरून रोटरी वर्ष २०२६-२७ हे “कर्तव्याचा जागर महोत्सव” म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी ते म्हणाले, “हे केवळ एक रोटरी वर्ष नसेल, तर सेवा, संस्कार, विकास आणि उत्साहाचा अखंड उत्सव असेल. प्रत्येक सदस्य, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाला या उत्सवाचा भाग बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
रोटरीच्या सात प्रमुख सेवा क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापना, रोगप्रतिबंधक उपाय, स्वच्छ पाणी व स्वच्छता, माता व बाल आरोग्य, शिक्षण व साक्षरता, आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आगामी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लबच्या ७० व्या वर्षानिमित्त ‘७० विद्यार्थी दत्तक योजना’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आवश्यक गरजांसाठी मदत करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी “Clean City – Green City” अभियानांतर्गत सुमारे पाच एकर जागेत वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या सहकार्याने काम करण्यात येणार आहे.
खारफुटी संवर्धन आणि किनारी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने खेकडा संवर्धन, शिंपले संवर्धन, मुसल संवर्धन, मासे मूल्यवर्धन, शोभिवंत मासे पालन आणि समुद्री शेवाळ संवर्धन यांसारख्या प्रकल्पांना क्लबतर्फे मदत करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला बचतगट आणि मच्छीमार बांधवांसाठी उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी श्री पद्धतीच्या शेतीचे मॉडेल उभारण्यात येणार असून शाश्वत शेतीचा संदेश दिला जाणार आहे. तसेच “Mission Youth Against Drugs” अंतर्गत युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
“Family Health Mission” अंतर्गत गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे. आगामी ३० ऑगस्ट रोजी ‘रेन रन’ उपक्रम आयोजित करून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे.
रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठीही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच क्लब सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दरमहा सांस्कृतिक, शैक्षणिक व कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवकांमध्ये नेतृत्वविकासासाठी रोटरॅक्ट क्लबला अधिक बळकटी देण्यात येणार असून, रोटरीची सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन क्लब स्थापनेचाही संकल्प करण्यात आला आहे.
यावेळी रत्नागिरीतील १८ वर्षांवरील युवक-युवतींना रोटरॅक्ट क्लबमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. इच्छुक विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोटरॅक्ट क्लबमध्ये प्रवेश देण्यात येणार असून, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि कौशल्यवृद्धीच्या माध्यमातून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी रोटरीतर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी सांगितले.
शेवटी अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी सर्व सदस्यांना “कर्तव्याचा जागर” या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन करत, “Service Above Self” या रोटरीच्या ब्रीदवाक्याला कृतीत उतरवून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे ७० वे वर्ष सर्वात संस्मरणीय, प्रभावी आणि प्रेरणादायी बनवूया,” असे आवाहन केले.
या पदग्रहण सोहळ्यास रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक, रोटरीचे विद्यमान व माजी पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० व्या वर्षाच्या वाटचालीला प्रेरणादायी सुरुवात झाली.
रोटरीच्या ७० वर्षांच्या समृद्ध परंपरेला आधुनिक विचार, युवकांचा सहभाग आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांची जोड देत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी नव्या पर्वाची सुरुवात करत असल्याची भावना या पदग्रहण सोहळ्यातून व्यक्त झाली. आगामी वर्षात “कर्तव्याचा जागर महोत्सव” या संकल्पनेद्वारे समाजाच्या विविध घटकांपर्यंत सेवा, संस्कार, विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
