सावर्डे विद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा

सावर्डे विद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा

सावर्डे विद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा
हरित सेनेचा उत्स्फूर्त सहभाग; जनजागृती फेरीतून कृषी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सावर्डे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर साजरा करण्यात येणारा कृषी दिन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कृषीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची गरज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यालयात प्रभात फेरी, वृक्षारोपण, मार्गदर्शन आणि भित्तीपत्रक उद्घाटन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील शिक्षक गणेश बागवे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या कृषीविषयक दूरदृष्टीच्या धोरणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शेतकरी हिताचे निर्णय, आधुनिक शेतीचा प्रसार आणि महाराष्ट्राच्या कृषी विकासातील त्यांच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक भानुदास चव्हाण यांनी भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कृषी दिनाचे महत्त्व, तो साजरा करण्यामागील उद्देश, शेतीचे अर्थव्यवस्थेतील स्थान तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यालय परिसरात प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
विद्यालयाच्या हरित सेनेने कृषी दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी कृषी, जलसंवर्धन, वृक्षलागवड आणि पर्यावरण संरक्षण याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणा देत परिसरात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. हरित सेनेचे प्रमुख साजिद चिकटे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवी ‘ब’ मधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक व माहितीपूर्ण कृषी दिन विशेष भित्तीपत्रकाचे उद्घाटन पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तीपत्रकाद्वारे कृषीचे महत्त्व, वसंतराव नाईक यांचे कार्य, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत शेती याबाबत प्रभावी माहिती सादर करण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य राजेंद्र वारे म्हणाले, “मानवी जीवनात वृक्षांचे स्थान अनन्यसाधारण आहे. वृक्ष हेच पर्यावरणाचे खरे रक्षक असून प्रत्येकाने वृक्षांशी मैत्री केली पाहिजे. ‘एक मूल – एक झाड’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईसोबत किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. त्यामुळे वसुंधरेचे संवर्धन होईलच, शिवाय देशाच्या प्रगतीतही आपला मोलाचा वाटा उचलेला जाईल.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हरित सेनेचे विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कृषी दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती, पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून विद्यालयाचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

Breaking News