🔴झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – आमदार किरण सामंत
कडूगाव : जिल्हा परिषद शाळा कडूगाव आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार किरण सामंत म्हणाले, “वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा दीर्घकालीन संकल्प आहे. झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वतः लावलेल्या झाडाची मुलाप्रमाणे काळजी घेतली, तरच हरित आणि समृद्ध भवितव्य निर्माण होईल.”
ते पुढे म्हणाले की, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक कुटुंबाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असून, आजची मुले उद्याचे जबाबदार नागरिक बनणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्ये देत वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक रोपाची नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले. परिसरात विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती तसेच सावलीची झाडे लावण्यात आली.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळा कडूगाव परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे दिपाली दळवी, विनोद सावंत अल्ताफ काझी मनोहर कडू ,गुरुप्रसाद पवार, संदेश घगवे, गावकर अभिषेक बडबे राजा बडबे, आबा बडवे, राजाराम घुगे पंचायत विस्तार अधिकारी पांचाळ सर, परशुराम कडू ,रविकांत सुर्वे सुभाष पवार ,सुभाष कळंबटे, ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे वृक्षारोपणाचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
