स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रम उत्साहात साजरे
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर M.S. Naik Primary English Medium School, Ratnagiri येथे दिनांक ९ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध देशभक्तीपर व शैक्षणिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिन, देशभक्ती, राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरात राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. तसेच समूहगीत व देशभक्तीपर नृत्याचे सुंदर सादरीकरण करण्यात आले.
शिक्षकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी देशभक्ती व तिरंग्यावर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, समूहगीत, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
या सर्व उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष श्री. नोमान नाईक, संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. शिक्षकांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा उत्सव संस्मरणीय ठरला.
