गोव्याच्या कदम्बची पणजी गणपतीपुळे गाडी सुरू
रत्नागिरी : गोवा राज्य परिवहन म्हणजेच कदम्ब ट्रान्स्पोर्टची पणजी-गणपतीपुळे मार्गावरील कोकणकन्या गाडी सुरू झाली आहे.
ही गाडी दररोज पणजीतून सुटल्यानंतर सावंतवाडी, कणकवली, राजापूर, आडिवरे, पावस, रत्नागिरी या मार्गाने गणपतीपुळ्याला पोहोचणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने अजून गाडी सुरू केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग (ता. देवगड) येथील कार्यकर्ते अविनाश गोखले यांनी एसटी आणि कदंब ट्रान्स्पोर्टकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. अखेर कदंबचे महाव्यवस्थापक जी. एम. पेडणेकर यांनी त्याची दखल घेऊन गाडी सुरू केली आहे. ही गाडी शिरोडा, वेंगुर्ले, मालवण, देवगड, आडिवरे अशा सागरकिनारी मार्गावरून धावायला हवी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तूर्त प्रायोगिक सावंतवाडी, राजापूरमार्गे गाडी सुरू झाली आहे.
ही गाडी पणजीहून दररोज दुपारी १ वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार असून ती बांदा (दुपारी २.४५), सावंतवाडी (३.३०), कणकवली (५.००) खारेपाटण (५.४५) राजापूर (७.००), रत्नागिरी (९.००) येथे थांबून रात्री सव्वादहा वाजता गणपतीपुळ्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून रत्नागिरी (८.३०), पावस (९.००), राजापूर (१०.३०), खारेपाटण (१०.४५), कणकवली (१२.००), सावंतवाडी (१.३०) येथे थांबून सायंकाळी पावणेचार वाजता पणजीला पोहोचेल.
या वेळापत्रकानुसार आणि मार्गावरून एसटीची सध्या तरी कोणताही गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे कदम्बच्या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
