कुंभार्ली, दि. २८ मे २०२५ –
गेल्या ८ महिन्यांपासून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याच्या विरोधात, तसेच नवीन विहिरीच्या मंजुरीसाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कुंभार्ली पंचायत समितीच्या पटांगणात तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
कुंभार्ली ग्रामस्थ मंडळ, तरुण उत्साही मंडळ, कुंभार्ली महिला मंडळ व युवा मंडळ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस, मा.नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर व त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाला योग्य दिशा दिली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर त्वरित कारवाईचा दबाव निर्माण झाला.
उपअभियंता, स्थानिक पाणीपुरवठा विभाग यांनी लेखी आश्वासन देत जल जीवन मिशन अंतर्गत नवीन विहिरीच्या कामास येत्या १५ दिवसांत सुरुवात होईल असे सांगितले. यामुळे कुंभार्ली-म्हाप्रळ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून गावात समाधानाचे वातावरण आहे.
या आंदोलनाच्या यशस्वीतेमागे मंडळाचे कार्यकर्ते राकेश म्हाप्रळकर, सचिन सवांदकर, संतोष कळमकर, मारुती म्हाप्रळकर, चंद्रकांत केळस्कर, आनंद कळमकर व इतर कार्यकर्त्यांची मेहनत मोलाची ठरली. अवघ्या एका तासात शासनाला निर्णय घ्यावा लागल्याचे हे उदाहरण ठरले.
संपूर्ण गावामध्ये वैभव खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या योगदानाबद्दल कौतुकाची चर्चा होत आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.