रत्नागिरीच्या ‘रत्नदुर्ग’ किल्ल्यावर १० मे रोजी भव्य स्वच्छता व संवर्धन मोहीम
रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या गडकिल्ल्यांचे जतन करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे. याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग आणि राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१० मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता रत्नागिरीतील ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग येथील महादरवाजा हनुमान मंदिर येथे भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नदुर्गाच्या महादरवाजा परिसर आणि हनुमान मंदिर क्षेत्रात ही मोहीम राबवली जाणार आहे. पावसाळा जवळ येत असल्याने किल्ल्यावरील वाढलेले गवत काढणे, प्लास्टिक कचरा हटवणे आणि परिसराची स्वच्छता करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व मावळ्यांनी आणि शिवप्रेमींनी संवर्धनासाठी आवश्यक असलेली हत्यारे उदा. विळा, कुदळ, घमेले, झाडू स्वतःसोबत घेऊन यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन” या ध्येयाने प्रेरित होऊन जास्तीत जास्त युवकांनी या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, तसेच मोहिमेच्या नियोजनासाठी किंवा सहभागासाठी ९९२०९०५९२०, ७६६६७०८२०१ आणि ८५९१५६८३७१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
