“स्वच्छता हीच सेवा” हा सामाजिक संदेश देत माहेर संस्थेत श्री गणरायाचे आगमन
निराधारांचा आधारवड ठरलेल्या रत्नागिरीतील माहेर या संस्थेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सव साजरा होत आहे. “स्वच्छता हीच सेवा”,” आपला परिसर स्वच्छ ठेवा, आजारापासून दूर राहा”. हा सामाजिक संदेश देत माहेर संस्थेत यावर्षी श्री गणरायाच्या आगमन झाले आहे. हा गणेशोत्सव सहा दिवस चालतो. दररोज सकाळ, सायंकाळी आरती तसेच प्रसाद बनवून व विविध ऍक्टिव्हिटी घेऊन प्रवेशितांच्या कलागुणांना वाव दिला जातो. मुला मुलींनी रेखाटलेल्या चित्राचे प्रदर्शन यावेळी माहेर संस्थेत भरवण्यात आले आहे. संस्थेतील प्रवेशित काही कारणास्तव आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून विभक्त राहत आहेत. त्यांना स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच या सणाचा आनंद घेता यावा याची तजवीज माहेर संस्थेने पूर्णपणे केली आहे. बाप्पाच्या आगमनाने माहेरवासीन मुले,मुली, महिला, पुरुष यांच्यामध्ये एक उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. गणपतीची सर्व सजावट ही मुलांनी तयार केली आहे. पर्यावरण पूरक गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून संस्थेने समाजामध्ये गेल्या अनेक वर्षे आदर्श निर्माण केला आहे.
