चिपळूणच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या
माजी आमदार कै. निशिकांत तथा नानासाहेब जोशी ह्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करत चिपळूण नगरपरिषदेने नाव दिलेल्या दैनिक ‘सागर’ चे संस्थापक – संपादक व माजी आमदार निशांत तथा नानासाहेब जोशी मार्ग’ या नामफलकाचे अनावरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नानासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न आणि लोकहिताचे प्रश्न सातत्याने मांडले. एका बाजूला प्रभावी पत्रकारिता करत असतानाच, दुसरीकडे राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी आपले एक वेगळे आणि आदरणीय स्थान निर्माण केले. त्यांचे विचार, त्यांची निष्कलंक प्रतिमा आणि जनसामान्यांशी असलेली त्यांची नाळ ही आपल्या सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे. नानासाहेबांसारख्या महान व्यक्तींची नावे जेव्हा सार्वजनिक मार्गांना दिली जातात, तेव्हा येणाऱ्या पिढीला त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा इतिहास सातत्याने प्रेरणा देत राहिल. असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार भास्करराव जाधव, चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपालीताई दांडेकर यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक – नगरसेविका, चिपळूणकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
