बाळासाहेब माने यांची माघार धक्कादायक व चिड निर्माण करणारी.. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग गरजल्या-..
👉 कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीतुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार बाळासाहेब माने यांनी घेतलेली माघार ही महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असून मित्र पक्ष व मतदारांच्या विश्वासाला तडा देणारी घटना आहे असे मत रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी व्यक्त केली आहे. महायुतीकडे आधीच पुरेसे संख्याबळ आणि मतदारांचे समर्थन असताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडणे हा भाजपचा हतबलतेतून केलेला राजकीय डाव असल्याचे दिसून येते. ही जागा काँग्रेस पक्षाकडे असती, तर विजय- पराजयाची चिंता न करता काँग्रेसने ही निवडणूक ताकदीने लढवली असती.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारामागे उभा राहिला असता. ज्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत संधी दिली, विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली, त्याच पक्षाला अडचणीत आणणारे नेते कोणत्याही पक्षात दीर्घकाळ समाधानाने राहू शकत नाहीत.
असे मत ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी व्यक्त केले आहे. भविष्यात अशा अविश्वसनीय उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या नावाखाली प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा गंभीरपणे विचार करणे अधिक योग्य ठरेल.
देशात सध्या भाजपविरोधी राजकारणाला बळ मिळत असून महायुतीतही अंतर्गत मतभेद आणि धुसफूस स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असल्याची चर्चा आहे. तसेच घराणेशाहीविरोधातील वाढता जनक्षोभ लक्षात घेता भाजपने बदलाचे वारे ओळखले आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला राजकीय दबाव किंवा घोडे बाजाराच्या माध्यमातून माघार घ्यायला लावणे म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखे आहे असा घणाघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी केला आहे
