लांज्यात उघड्या गटार चऱ्यांचा सापळा; अपघाताची भीती वाढली!
लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असताना, लांजा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गटारांचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी त्यालगत उघड्या चऱ्या ठेवल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या उघड्या चऱ्या अधिक धोकादायक ठरत असून, गुरे-जनावरे पडण्याच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांत पावसाळा सुरू होणार असल्याने या चऱ्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदार कंपनीशी संपर्क साधून चऱ्या बुजवण्याची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार समोर येत आहे.
महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात सुरक्षेची प्राथमिकता अपेक्षित असताना, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदारांनी तात्काळ उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
