मलेशिया येथील क्वालालंपूर येथे १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान खेळवल्या गेलेल्या अंडर १९ महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा दणदणीत पराभव करून अंडर १९ विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा भारताचे नाव कोरले आहे.
विश्वचषकात भारतीय संघ सर्व सामने एकहाती जिंकत ह्या स्पर्धेत अपराजित राहिला ही एक उल्लेखनीय बाब म्हणता येईल. भारताने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्या तिन्ही बाबतीत सरस कामगिरी केली. सर्व सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आणि स्कॉटलंड विरुद्ध भारताची सलामीची फलंदाज जी त्रिशा हिची नाबाद ११० धावांची शतकी खेळी स्पर्धेत छाप पाडून गेली.
मुंबईची पण मूळची रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील येळवण गावाची सानिकाने देखील एक अपवाद वगळता प्रत्येक सामन्यात नाबाद राहत उल्लेखनीय कामगिरी केली आहे…
या संघात महाराष्ट्रातील ३ महिला खेळाडू होत्या. ज्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची खेळाडू सानिका चाळके ( फलंदाज – उपकर्णधार) तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड मधील खेळाडू भाविका अहिरे ( विकेटकीपर-फलंदाज) आणि ईश्वरी अवसरे (ऑल राउंडर) ह्यांचे मोलाचे योगदान होते.
मुलींच्या ह्या यशाची नोंद श्री. आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी या तिन्ही खेळाडूंच्या मागे सातत्याने उभे राहणाऱ्या श्री. निरंजन मनोहर सोनवणे (जळगाव) यांच्या माध्यमातून घेतली आणि या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून श्री निरंजन सोनवणे यांच्या कडे जबाबदारी दिली. ह्या तीनही खेळाडूंचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे हस्ते मंत्रालयात सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभासाठी खेळाडूंच्या पालकांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रसंगी ना. अजित दादांनी सदर खेळाडूंना शासनाकडून मदतीचे आश्वासन दिले…
सदर खेळाडूंनां पालकमंत्री ना. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या देखील शुभेच्छा विश्वकप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मिळाल्या होत्या…