रत्नागिरीसीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
सावर्डे विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम; ‘एक राखी जवानांसाठी’ अभियानातून देशप्रेमाची भावना जागृत
सावर्डे : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे ‘एक राखी जवानांसाठी’ प्रसार व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या २०० हून अधिक आकर्षक राख्या आणि १८० कृतज्ञतापत्रे जवानांसाठी तयार केली. एकूण ७५ लिफाफ्यांमधून ही राखी व पत्रे डाक विभागामार्फत सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पाठविण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी सावर्डे पोस्टमास्टर जगदीश महाडिक यांचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले. पोस्टल कर्मचारी व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, चिपळूण विभागाचे आदित्य मयेकर यांचे स्वागत उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी, तर ब्रांच पोस्टमास्टर सत्यजित राजे शिर्के यांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले. जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पत्रांचे वाचनही करण्यात आले. इयत्ता दहावी ब मधील स्वरा टक्के हिने मराठी, इयत्ता बारावीतील नेहा जाधव हिने इंग्रजी, इयत्ता दहावीतील रिफद काद्री हिने हिंदी, तर रिया सावंत हिने मराठी भाषेतील पत्राचे वाचन केले.
पोस्टल कर्मचारी आदित्य मयेकर यांनी विद्यार्थ्यांना डाक विभागाच्या कार्याची माहिती देत मार्गदर्शन केले. सावर्डे पोस्टमास्टर जगदीश महाडिक यांनी पोस्ट व टपालपेटीचे महत्त्व तसेच पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी जवानांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या त्यागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सीमेवर जवान अहोरात्र तैनात असल्यामुळेच देशातील नागरिक शांततेने जीवन जगू शकतात, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
या उपक्रमासाठी सत्यजित राजे शिर्के (दहिवली), दीपक चव्हाण (आगवे), संचिता चव्हाण (दुर्गेवाडी), अनया चव्हाण (पुरुष), अजिंक्य शिर्के (मुंडे), मानसी कदम (असुर्डे), सुधीर कांबळे (डेरवण) आणि ओंकार जगताप (मांडकी) या ब्रांच पोस्टमास्टर्सनी जवानांना राख्या व कृतज्ञतापत्रे पाठविण्याच्या स्पीड पोस्टच्या कामात सहकार्य केले.
सकाळच्या सत्रातील उपक्रमासाठी सौ. शिल्पा राजेशिर्के यांनी सर्व वर्गशिक्षकांच्या सहकार्याने काम पाहिले, तर दुपारच्या सत्रात सौ. अनुजा बागवे यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ. अनुजा बागवे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. अमृता घाग यांनी केले.
विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या व पत्रांच्या माध्यमातून सीमेवरील जवानांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता हा उपक्रम देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय भावनेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

Breaking News