🛑आंबा-काजू नुकसान पंचनाम्याची आज अंतिम मुदत; प्रत्येक शेतकऱ्याने आजच नाव नोंदवावे— जि.प.सदस्या शिवानी सावंत यांचे आवाहन🛑
चिपळूण तालुक्यासह जिल्ह्यात अवेळी पाऊस, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनामार्फत सुरू असलेल्या पीक नुकसान पंचनाम्याची आज अंतिम मुदत असून, सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी तातडीने आपल्या गावातील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे पूर्ण करून घ्यावेत, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केले आहे.
सध्या पंचनाम्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे पूर्ण नाव व शेती क्षेत्राची नोंद घेतली जात असून, आवश्यक कागदपत्रे पुढील टप्प्यात सादर करावयाची आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने विलंब न करता आजच आपली नोंद करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, काही ठिकाणी ग्रामसेवकांशी संपर्क होण्यास अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधून सरपंचांकडे आपली नावे द्यावीत. मात्र कोणत्याही परिस्थितीत आजच पंचनाम्यासाठी नाव नोंदवणे अत्यंत आवश्यक असल्याचे शिवानी सावंत यांनी सांगितले.
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पंचनाम्यासाठी यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याने सर्व शेतकरी बांधवांनी आजच प्रक्रिया पूर्ण करून शासनाला सहकार्य करावे.
— शिवानी संदीप सावंत
जिल्हा परिषद सदस्या
स्थायी समिती सदस्या, जिल्हा परिषद रत्नागिरी
