रत्नागिरीनाईक स्कूल रत्नागिरीत कुरआन पठण , दुआ आणि कलिमांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन

नाईक स्कूल रत्नागिरीत कुरआन पठण , दुआ आणि कलिमांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन

नाईक स्कूल रत्नागिरीत कुरआन पठण , दुआ आणि कलिमांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या धार्मिक व नैतिक क्षमतांना वाव देणारा स्तुत्य उपक्रम; मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रत्नागिरी –  नाईक स्कूल, रत्नागिरीच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निवडक सूरांचे हिफ्ज (पाठांतर), दैनंदिन मस्नून दुआ आणि सात कलिमे यावर आधारित भव्य इस्लामिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पवित्र कुरआनविषयी प्रेम निर्माण करणे, धार्मिक शिक्षणाची आवड वाढवणे, दुआ व इस्लामिक शिकवणी आत्मसात करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआनच्या पठणाने झाली. मुसफिरा गहागरकर हिने कुरआन पठण केले, तर रुकय्या साखरकर आणि आयत आफताब सोलकर यांनी हम्द सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिद्दीक मोहम्मद हुसेन बारगीर यांनी अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत हाफिज शब्बीर हज्जू यांनी केले.
स्पर्धेच्या विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सात कलिमांच्या स्पर्धेत २४, निवडक सूरांच्या स्पर्धेत २५, तर मस्नून दुआंच्या स्पर्धेत ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा हा उत्स्फूर्त सहभाग शाळेत धार्मिक व नैतिक शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे दिसून आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून मौलाना झकी कासमी साहेब यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे बारकाईने परीक्षण करून निष्पक्षपणे निकाल निश्चित केले.
या कार्यक्रमास श्री. अशफाक नाईक सर, मौलाना जैद मजगांवकर साहेब आणि मौलाना जैद गूहागरकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरिफा मालदार यांनी आपल्या भाषणातून धार्मिक शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक उपक्रमांसोबतच नैतिक व धार्मिक मूल्यांची जोपासना करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवले.
त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या धार्मिक ज्ञानाला आणि आत्मविश्वासाला चालना मिळते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मौलाना उसामा हज्जू साहेब यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी सर्व मान्यवर पाहुणे, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग, स्पर्धेचे परीक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी मौलाना झैद मजगांवकर साहेब यांनी दुआ केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात आजच्या काळात मुलांना आधुनिक शिक्षणासोबत कुरआन, हदीस, मस्नून दुआ, इस्लामिक संस्कार आणि नैतिक मूल्यांची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
नाईक स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या धार्मिक, नैतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेला एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांसोबत धार्मिक व नैतिक शिक्षणालाही दिले जाणारे महत्त्व निश्चितच कौतुकास्पद आहे.
आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना काळासोबत पुढे जाण्याची दिशा देते; तर धार्मिक व नैतिक शिक्षण त्यांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. या दोन्हींचा समतोल साधणारे शिक्षणच एक सुशिक्षित, संस्कारी, जबाबदार आणि सक्षम पिढी घडवू शकते.

Breaking News