नम्र आवाहन : पर्यटनाचा आनंद घ्या, पण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या!
पर्यटक बंधू-भगिनींनो,
अत्यंत दुःखद घटनांची नोंद घेणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांत कोकणात दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत :
१. आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ वाहन १२०० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे १८ ते २५ वयोगटातील ८ युवकांचा मृत्यू झाला.
२. जून महिन्यात गणपतीपुळे येथे समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ५ पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेले हे तरुण आपल्या कुटुंबियांकडे परतू शकले नाहीत. या सर्व दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐
आजच्या धावपळीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत वीकेंडला विरंगुळ्यासाठी बाहेर पडणे स्वाभाविक आहे. परंतु, मौज-मजेच्या भरात आपल्या अमूल्य जीवाची सुरक्षितता विसरून चालणार नाही.
पावसाळी व समुद्रकिनारी पर्यटन करताना खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ही विनंती :
१. वाहनाचा वेग व वाहतूक शिस्त : घाटरस्त्यावरील अवघड वळणांवर व निसरड्या रस्त्यांवर वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. दरीच्या कडेला होणाऱ्या एका लहानशा चुकीलाही माफी नसते. ‘उशिरा पोहोचलेले बरे, पण सुरक्षित पोहोचणे अधिक महत्त्वाचे.’
२. रील व सेल्फीचा अतिरेक टाळा : केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी धोकादायक कड्यांवर, समुद्राच्या लाटांमध्ये किंवा पुलाच्या कठड्यावर उभे राहून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. ‘एक रील संपूर्ण आयुष्यावर भारी पडू शकते.’
३. जलस्रोतांजवळ विशेष सावधगिरी बाळगा :
– समुद्रात खोलवर जाऊ नये. लाटांचा व प्रवाहाचा अंदाज लावणे कठीण असते.
– ‘मला पोहता येते’ या आत्मविश्वासावर समुद्रात उतरू नये. समुद्राचे पाणी व प्रवाह वेगळे असतात.
– मद्यपान करून पाण्यात उतरू नये.
– प्रशासनाने ‘पोहण्यास मनाई’ फलक लावलेल्या किंवा लाल बावटा उभारलेल्या ठिकाणी जाऊ नये.
– धबधब्याखालील दगडांवर उभे राहणे व सेल्फी घेणे टाळावे. दगड निसरडे असतात व पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो.
४. रात्रीचा प्रवास टाळा : शक्यतो घाटरस्त्याने व निर्जन समुद्रकिनाऱ्यावर रात्रीचा प्रवास करू नये. धुके, पाऊस व कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका वाढतो.
५. स्थानिक सूचना व प्रशासनाचे नियम पाळा : जीवरक्षक, पोलीस व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात. धोक्याच्या जागांची माहिती त्यांनाच अचूक असते.
लक्षात ठेवा – सहल दोन दिवसांची असते, पण गेलेले आयुष्य परत मिळत नाही. तुमचे आई-वडील व कुटुंबीय तुमची घरी वाट पाहत असतात.
“सेल्फी काढा, पण स्वतःला सेफ ठेवा!”
“लाईक महत्वाचे नाहीत, तुमचे लाइफ महत्वाचे आहे!”
सुरक्षित पर्यटन करा, आनंदी रहा व सुखरूप घरी परता.
श्री अजित अनुराधा आबाजीराव कदम,
श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम,
मु. पो. टेरव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी,
विशेष कार्यकारी अधिकारी,
सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.
9819331960
